डॉ. परशराम पाटील यांची महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सदस्यपदी निवड
सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव

चंदगड : राज्यातील सर्व किनारी भागातील लघु बंदरांचे नियोजन, विकास, व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळावर तज्ञ म्हणून डॉ. परशराम पाटील यांची निवड करण्यात आली. राज्य सरकारच्या गृह विभागाने पत्र प्रसिध्दीस दिले आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत डॉ. परशराम पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. परशराम पाटील हे चंदगड तालुक्यातील गुडेवाडी गावचे रहिवाशी असून ते सध्या विकसीत महाराष्ट्र मूख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सल्लागार, महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे सदस्य, कांदा व टोमॅटो मंडळाचे सदस्य, गोवा सरकारच्या निती आयोगाचे सदस्य, एफएओमध्ये कृषी इकॉनॉमिस्ट, महाराष्ट्र काजू बोर्डचे संचालक, मित्रचे सदस्य, अपेडा या भारत सरकारच्या संस्थेच्या संचालक मंडळावर काम करत आहेत. डॉ. पाटील हे कृषी अर्थशास्त्र, अन्नसुरक्षा, कृषी धोरण, सार्वजनिक आरोग्य आणि जागतिक भू-राजकारण या क्षेत्रातील जाणकार अभ्यासक व संशोधक म्हणून ओळखले जातात. शेतकयांचे उत्पन्न, विविध पिकांची उत्पादकता, बाजारातील किंमत चढउतार, मुक्त व्यापार करारांचे परिणाम, पोषणविषयक मुद्दे आणि आरोग्य व्यवस्थेवरील प्रभाव अशा महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी परिणामकारक संशोधन केले आहे. त्यांच्या अभ्यासाचा थेट उपयोग धोरणनिर्मिती आणि निर्णयप्रक्रियेत केला जात असून त्यामुळे शासकीय यंत्रणेला दिशादर्शक मार्गदर्शन मिळत आहे.



