चंदगड : प्रतिनिधी
दौलत सहकारी साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी दौलत साखर कामगारांच्या घरातील महिला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शुक्रवार (दि. २४) रोजी भेटणार असल्याचे कॉ. उदय नारकर यांनी सांगितले. ‘दौलत’च्या शेतकरी, कामगार, ऊस तोडणी आणि वाहतूकदार कामगारांच्या सभेत ते बोलत होते.दौलत भाडेतत्त्वावर चालवणारे मानसिंग खोराटे हे कोणतेच कायदे पाळत नाहीत, यासाठी कामगार, शेतकऱ्यांच्या व्यथा पालकमंत्र्यांच्या कानावर घालण्याचा यामागे उद्देश आहे, असे ते म्हणाले. सभेच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे प्रा. आबासाहेब चौगले होते. कामगार नेते कॉ. अतुल दिघे, सुभाष देसाई, शेखर गावडे, नंदकुमार गावडे, श्रीधर शिंदे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, तानाजी गडकरी, दशरथ दळवी, रवी नाईक, महादेव फाटक, नारायण तेजम, दिलीप कदम, संजय देसाई, सुरेश पाटील, संजय हाजगोळकर आदींनी शेतकरी कामगारांच्या लढ्याला मनोगतातून पाठिंबा व्यक्त केला. अशोक गावडे यांनी सूत्रसंचालन केले. सभेला शेतकरी आणि कामगार उपस्थित होते. महादेव फाटक यांनी आभार मानले.
तोडगा न निघाल्यास अथर्व प्रशासन जबाबदार
२८ ऑक्टोबर रोजी बोलावलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न काढल्यास कामगारांना लढ्याचे पुढील पाऊल उचलावे लागेल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी ‘अथर्व’ प्रशासनावर राहील, हा चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे सचिव प्रदीप पवार यांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.



